महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
सर्वसामान्य लोकांसह विविध संस्था, पक्ष नेते, गांधी विचाराचे लोक राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. त्यांच्या यात्रेमुळे मोठी सहानुभूती निर्माण झाली असून या यात्रेमुळे विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता होण्यास मदत होईल, असे मत खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, राहुल गांधी यांनी सातत्याने सत्ताधारी पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्यावर सातत्याने टीकाटिप्पणी होत असते. त्यांनी कन्याकुमारी पासून भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला सुरुवातीपासून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे नेते आणि अन्य पक्षाचे नेतेही सहभागी झाले होते. अनेक सार्वजनिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात्रेत सहभागी होत आहे .गांधी विचारांच्या संस्थाही सहभागी होत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता ही उस्फूर्तपणे भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहे. त्यांच्या यात्रेमुळे सहानुभूती निर्माण झालेली आहे. सत्ताधारी विरुद्ध ते लढत असल्याने भारत यात्रेमुळे विरोधी पक्षा एकवाक्यता होण्यास मदत होणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रात सुरुवातीपासून नाखूष आहेत असे त्यांनी वक्तव्य केले आहे ,याबद्दल पवारांना प्रश्न केला असता, आम्हीही त्यांच्याबद्दल नाखूष आहोत, अशा शब्दात खिल्ली उडविली. ते म्हणाले, महाराष्ट्रात चांगली परंपरा असणारे राज्यपाल झाले आहेत. त्यांनी चांगले काम केले आहे. राज्याच्या हितासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. पण भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदावर येताच सतत त्यांच्या वक्तव्याबद्दल चर्चा होत आहे. टीका होत आहे. ते चुकीचे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. राज्यपालांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्र आहे.त्याचबरोबर आणखीन काही पक्षांच्या बरोबर चर्चा सुरू आहे .सध्या लोकसभा निवडणुकीबाबत फक्त चर्चा सुरू आहेत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही हेही पवारांनी स्पष्ट केले.
राज्यातील नेते एकमेका विरोधात टीका करताना टोकाची भाषा वापरत आहेत याबद्दल प्रश्न केला असता ते म्हणाले, भाजप विरुद्ध काँग्रेस, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष होणारच आहे, पण त्याच्याकडे सत्ता आहे ते बेताल वक्तव्य करत आहेत, सत्ताधारी पक्षाने आपले वर्तन चांगले ठेवले पाहिजे, एखाद्या नेत्याचा जामीन रद्द करतो अशी टोकाची भूमिका घेणे हे योग्य नाही.
शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत तरीही कडवा शिवसैनिक बहुसंख्येने उद्धव ठाकरे यांच्या समवेत आहे. त्याला कोल्हापूरही अपवाद नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा न्यायप्रविष्ठ आहे. पंधरा दिवसात या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू राहणार आहे. या सुनावणीच्या वेळेला महाराष्ट्राची बाजू योग्य मांडावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकही बोलावली होती .या बैठकीत महाराष्ट्राचे हिताचे योग्य मत मांडावे असा निर्णय झालेला आहे असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, उद्योगपती व्ही.बी. पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.