आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे चिरंजीव अभिषेक डोंगळेंनी सुरू केलेल्या ‘हॉटेल चिरंजीवी’चा उद्घाटन सोहळा राजकीय टोलेबाजीने रंगला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप-शिंदे सरकारवर केलेली टोलेबाजी, स्वपक्षीय व सहकारी पक्षातील नेते मंडळीचा काढलेला चिमटा, अध्यक्ष निवडीतील पडद्यामागील राजकारणावर केलेला खुलासा यामुळे उपस्थितांची हसता हसता पुरेवाट झाली. दरम्यान या उद्घाटन सोहळयात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी गोकुळचे विद्यमान चेअरमन विश्वास पाटील यांच्या कामगिरीचे कौतुक आणि भावी चेअरमन अरुण डोंगळे यांना दिलेल्या शुभेच्छा संबंधितांना सुखावणाऱ्या होत्या.
दोन्ही काँग्रेसचे आजी-माजी आमदार आणि शिंदे गटाचे खासदारांच्या उपस्थितीत शनिवारी हॉटेल उद्घाटन सोहळा झाला. या सोहळयाचे प्रमुख पाहुणे होते, अजित पवार. त्यांनी नेहमीप्रमाणे दिलखुलास टोलेबाजी केली. शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्रही सोडले. आगामी गोकुळच्या चेअरमपदाच्या निवडीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना उद्देशून ‘ठरलंय त्याप्रमाणे निवडी होणार ना ?’असा सवाल करत कार्यक्रमात रंग भरला.
“अनेकदा अध्यक्ष, चेअरमन निवडीवेळी नाव एकाचे निश्वित होते आणि ऐनवेळी साहेबांचा फोन आला म्हणून दुसऱ्यांना संधी दिली जाते असा प्रकार घडतात. गोकुळच्या चेअरमन निवडीत असे काही होणार नाही ना ? अशी विचारणा करत पवार यांनी जिल्ह्यातील नेते मंडळींची फिरकी घेतली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते व्ही. बी. पाटील यांनी खासदार व जिल्ह्यातील दोन्ही आमदारांनी एकत्रित येत निर्णय घेतल्याचे सांगितले.तेव्हा अजित पवार यांनी भावी चेअरमन अरुण डोंगळे यांचे डबल अभिनंदन. पहिले अभिनंदन हॉटेल शुभारंभासाठी, दुसरे अभिनंदन चेअरमनपदासाठी अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.
या भाषणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले यांनी हॉटेल सयाजीवरुन डीवायपी ग्रुपचे कौतुक केले. डीवायपी ग्रुपच्या विविध संस्थांचा कौतुकपूर्ण उल्लेख करताना अजित पवार यांनी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे पाहत, ‘ अल्पावधीतच हॉटेल सयाजी हा कोल्हापूरची वेगळी ओळख बनला आहे.मात्र त्यांच्या संस्थेमध्ये डीवायपी ग्रुप परिवारातील लोकांचा समावेश असतो. डीवायपी ग्रुप अशा संस्थेतून घराबाहेर जास्त काही जाऊ देत नाही. ’असे म्हणताच सारेजण त्या हास्यांत सामील झाले. आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील हे ही हास्यात सामील झाले.
तत्पूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांनी, गोकुळचे विद्यमान चेअरमन विश्वास पाटील यांच्या दोन वर्षाच्या चेअरमनपदाच्या कामकाजाचे कौतुक केले. विश्वास पाटील यांच्या कालावधीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना ११ रुपये दूध खरेदी दरवाढ दिली. गोकुळच्या आर्थिक उलाढालीत ८७० कोटी रुपयांची वाढ झाली. याबद्दल विश्वास पाटील यांचे अभिनंद असा शब्दांत कौतुक केले. गोकुळचे भावी चेअरमन अरुण डोंगळे यांचेही अभिनंदन. डोंगळे यांच्या चेअरमनपदाच्या कालावधीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध खरेदी दरात वीस रुपयांची वाढ व्हावी आणि गोकुळच्या आर्थिक उलाढालीत १५०० कोटी रुपयांची वाढ झाली पाहिजे अशा शब्दांत डोंगळे यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
…………..
सतेज पाटलांनी वेधले नवीन रेल्वे लाइनकडे लक्ष
आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध विकासकामांना दिलेल्या चालनांचा ऊहापोह केला. दीड-दोन महिन्यात थेट पाइपलाइनचे काम पूर्ण होईल असे सांगितले. विमानसेवेसाठी महाविकास आघाडीने जवळपास २०० कोटी रुपये निधी दिला. जिल्ह्याच्या विकास गतीमान होण्यासाठी कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गालगत नवीन रेल्वे लाइनची सुविधा निर्माण करायला हवी. यासंबंधी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा झाल्याचेही त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणले.
..................
शिंदे सरकारच्या आमदाराने अडविला बिद्रीचा डिस्टलरी प्रकल्प
भाषणात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामकाजाचाही पंचनामा केला. आम्ही सत्तेत असताना निधी वाटपात विरोधकांवर अन्याय केला नाही. त्यांच्या फायली कधी अडविल्या नाहीत. दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणीस सरकारने, महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीतील विकासकामांना स्थगिती दिली. कारण सांगायला तयार नाहीत. ही कामे महाविकास आघाडीच्या आमदारांच्या घरची असतात का ? जनेतशी निगडीत ही विकासकामे आहेत. पण सरकारला काही देणेघेणे नाही. ३१ मार्च २०२३ अखेर विकासकामाची एक लाख कोटीची बिले थकली आहेत. बिद्री काररखान्याची डिस्टलरीची फाइल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. संबंधित खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी चर्चा केली. पण कार्यवाही नाही. काही दिवसानंतर मंत्री देसाई यांच्याकडे बिद्री कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाच्या फाइलविषयी विचारणा केली. तेव्हा मंत्री देसाईंनी सांगितले, की तिथल्या शिंदे गटाच्या आमदारानी नको म्हणून सांगितले आहे. अरे कारखाना लोकांचा, शेतकऱ्यांच्या मालकीचा. या कारखान्याची 70 हजार सभासद आहेत. तो कारखाना के. पी. पाटील यांच्या व्यक्तिगत मालकीचा नाही. तेव्हा सत्तेचा गैरवापर करुन विकासकामांत अडवणूक करण्याऐवजी निवडणूक लढवा. लोकं ठरवतील सत्ता कोणाकडे द्यायची. लोकांनी तुम्हाला कौल दिला तर कारखाना तुम्ही ताब्यात घ्या. पण हा काय प्रकार आहे, कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पात अडवणूूक करायची. एक लक्षात ठेवा, ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी देखील असतात. चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे. तेव्हा बेरजेचे राजकारण करा, समज्यंसाची भूमिका घ्या. ”अशा शब्दांत पवार यांनी शिंदे –फडणवीस सरकार व संबंधित आमदारांना टोला हाणला.