महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "केएमटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात राज नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बैठक घेऊन चर्चा केली. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, रोस्टर प्रमाणे रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेणे आणि रखडलेली पदोन्नती यासंबंधी प्रस्ताव तयार करून सादर करा सरकारकडे पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करू " अशी ग्वाही क्षीरसागर यांनी दिली. .
केएमटी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी २०१९ पासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्याना ७ वा वेतन आयोग फरकासह लागू झालेला आहे. परंतु, के.एम.टी. कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तो तात्काळ लागू करावा. रोजंदारी कर्मचारी गेली २५ ते ३० वर्षे काम करत असून, बिंदू नामावली (रोस्टर) तपासून २ महिन्यांचा अवधी झाला तर त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय प्रलंबित आहे. यासह पद्दोनती प्रक्रियाही रखडली असल्याची माहिती देत. यामध्ये लक्ष घालून प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याबाबत विनंती केली.
यावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून के.एम.टी.कर्मचाऱ्यांच्या ७ वा वेतन आयोग, रोस्टर व पदोन्नती प्रक्रिये संदर्भात दोन दिवसात प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, उपशहरप्रमुख अश्विन शेळके, म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन (रजि.) संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, जनरल सेक्रेटरी इर्शाद नायकवडी, राजू वडर, मानसिंग जाधव, मारुती पाटील, सचिन गवळी, ज्ञानबा शिंदे, अनिल चव्हाण उपस्थित होते.