महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : " बेळगाव आमच्या हक्काचे-नाही कोणाच्या बापाचे, बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, कोण म्हणतय देत नाही- घेतल्याशिवाय राहत नाही, रहेंगे तो महाराष्ट्र मे- नही तो जेल में, संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय असो"अशा गगनभेदी घोषणा, डोक्यावर भगवी टोपी आणि हातात भगवा झेंडा घेऊन कोल्हापूरवासियांनी सोमवारी (२६ डिसेंबर) संपूर्ण ताकत सीमाबांधवांच्या पाठीशी उभी केली. दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन करत सीमाप्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावरची लढाई कायम राहील" अशी ग्वाही सीमा वासियांना दिली.
"पक्षभेद विसरून सीमावासियांना कोल्हापूरकरांचा पाठिंबा राहील. सीमाप्रश्न सुटेपर्यंत हा सारा भाग केंद्रशासित प्रदेश करावा" अशी आग्रही मागणी सरकारकडे करण्यात आली. तर "मराठी माणसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. मराठी माणसांची गळचेपी करू नका. " असा इशारा यावेळी कर्नाटक सरकारला देण्यात आला. खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक,माजी मंत्री भरमू पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजू आवळे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, मनसेचेे पुंडलिकराव जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार यांची भाषणे झाली. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते बेळगावहून मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल झाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी माजी आमदार मनोहर किणीकर, मालोजी अष्टेकर, दिगंबर पाटील, माजी महापौर प्रकाश शिरोळकर, शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, रेणू किल्लेदार, विकास कलगटगी, शिवानी पाटील, साधना पाटील, शुभम शेळके, विजय शिंगटे, वकील सुधीर चव्हाण आदींचा सहभाग होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथून आंदोलनाला सुरुवात झाली. ,तत्पूर्वी सीमावासियाना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या संघटना पक्षाचे कार्यकर्ते दसरा चौकात एकवटले होते. भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, शेकाप आरपीआय, डाव्या संघटनेसह वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. कार्यकर्त्यांनी मोर्चा मार्गावर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला."सीमाप्रश्नी ज्यांनी बलिदान दिले ते बलिदान व्यर्थ जाणार नाही म्हणूनच हा लढा, कारवार- निपाणी-बिदर-भालकी- बेळगावसह ८६५ गावांचा महाराष्ट्रमध्ये समावेश झाला पाहिजे, एक सीमावासी-लाख सीमावासी, "या आशयाचे फलक कार्यकर्त्यांच्या हाती होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, "सीमाभागातील ८६५ गावे ही महाराष्ट्रात समाविष्ट झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमची छाती उघडून पाहिले तर संयुक्त महाराष्ट्राचे चित्र दिसेल. सीमा भागातील विद्यार्थी, शाळा यांना वेगवेगळ्या सुविधा देण्याची सरकारची भूमिका आहे.लवकरच हा प्रश्न निकाली लागेल." शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी चंदगड येथील शिनोळी नाका येथे मराठी बांधवांचा महामेळावा घेऊ असे जाहीर केले. आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, राजेखान जमादार, ठाकरे गट शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी, भाजपचे महेश जाधव, राहुल चिकोडे, विजय अग्रवाल, मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले, माजी नगरसेवक सत्यजित कदम, बाबा पाटेऺ, आशिष ढवळे, अनिल कदम, सुभाष रामुगडे, वैभव माने, अनिल घाटगे, विजय करजगार, कॉम्रेड दिलीप पवार, शिवाजीराव परुळेकर, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, एम.बी.शेख आदींचा सहभाग होता. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.