सुमंगलम महोत्सवाच्या कोल्हापूर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "सिद्धगिरी कणेरी मठ येथे २० ते२६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सुमंगलम महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. तसेच या महोत्सवात दहा राज्यांचे मुख्यमंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल, ५०० हून अधिक कुलगुरू, एक हजारांहून अधिक साधू-संत आणि लाखो लोकांचा सहभाग असणार आहे."अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सात दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी कोल्हापूर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (१५जानेवारी ) मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. अदृश काडसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. टाकाळा, माळी कॉलनी येथे संपर्क कार्यालय सुरू केले आहे.
मंत्री पाटील म्हणाले," अनेक राज्यातून या उत्सवाच्या तयारीसाठी स्वयंसेवक येत आहेत. समाजातील तरुण व विविध सामाजिक संस्थांनी या महोत्सवासाठी योगदान द्यावे. या महोत्सवासाठी राज्य सरकारचे विविध विभाग काम करत आहेत.आंतरराष्ट्रीय सुमंगलम महोत्सव पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणार आहे " असे मंत्री पाटील यांनी सांगितले. या महोत्सवात हजारो स्टॉल असतील. तसेच बचत गट, दुर्गम भागातील संस्थांनी तयार केलेले उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या उत्सवात पन्नास हजार अतिथी व स्वयंसेवकांना राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त कोल्हापूर शहरात मिरवणुकीचे आयोजन केले आहे. कोल्हापुरातील लोकांनी या उत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला खासदार संजय मंडलिक, बांधकाम व्यावसायिक शंकर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, संजय एस.पाटील, माणिक पाटील-चुयेकर, भाजपचे राहुल चिकोडे, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील, बापू कोंडेकर, कुमार पाटील, पारस ओसवाल, डॉ.संदीप पाटील आदी उपस्थित होते.