महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वीच विरोधक आणि सत्ताधारी नेते मंडळीत आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना सत्ताधारी आघाडीचे संचालक माजी आमदार अमल महाडिक यांनी ‘सतेज पाटीलांनी गावगुंडाप्रमाणे धमकीची भाषा वापरू नये ; महाडिकांसाठी बावडा परका नाही. शिवाय राजाराम कारखान्याला नाव लावायला मी काही सतेज पाटील नाही”अशा शब्दांत पलटवार केला आहे.
कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीचा मंगळवारी मेळावा झाला. या मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्याची शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा ही माजी आमदार महादेवराव महाडिक व अन्य संचालकांची शेवटची सभा असेल. कारखान्यात परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज राहा’असे आवाहन केले होते.
आमदार पाटील यांच्या टीकेला अमल महाडिक यांनी पलटवार केला आहे. महाडिक यांनी पत्रकांत म्हटले आहे, “कुठल्यातरी कोपऱ्यात लपूनछपून सभा घेणे ही आमची पद्धत नाही. महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व सभासद बंधू या सभेला उपस्थित राहतील व राजाराम कारखाना योग्य हातातच आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतील. एकीकडे सभा सुरळीत चालवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असताना, दुसरीकडे विरोधकांनी मेळावा घेऊन सवयीप्रमाणे टिकाटिप्पणी केली. रात्रंदिवस फक्त ७/१२ आणि जमीन एवढेच विचार या व्यक्तीच्या डोक्यात असतात का ? राजाराम कारखान्यात मागील ३० वर्षे आम्ही सत्तेत असताना कारखान्याचा ७/१२ आणि नाव आहे तसं जपलं. याउलट सतेज पाटलांनी मात्र सप्तगंगा साखर कारखाना ताब्यात घेताच पुढील ५-१० वर्षात त्या कारखान्याचे नाव बदलले. एवढंच नाही तर १०००० सभासद एका रात्रीत कमी केले. कारखान्याचं जाऊदे, किमान 'अजिंक्यतारा' या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा ७/१२ आधी कोणाच्या नावावर होता आणि आता कोणाच्या नावावर आहे, एवढं तरी त्यांनी जाहीर करावं.”
……….
राजाराम कारखान्याचा कारभार उत्तम
महाडिक म्हणाले, “राजाराम साखर कारखान्याचा कारभार अतिशय उत्तमरीत्या सुरू आहे. सभासदांना ऊस बिले वेळेत दिली जातात, कामगारांचे पगार वेळेत होतात. त्यामुळे कारखान्याच्या कारभारावर कुठेही बोट ठेवायला जागा नाही आणि हीच कारखान्याची प्रगती आमच्या विरोधकांसाठी अडचणीची ठरत आहे. ज्यांनी स्वतः सहकाराचा गळा घोटण्याचं पाप केलं, २-२ पिढ्यांनी मिळून शासकीय जमिनी लाटल्या, देवस्थानच्या जमिनी लाटल्या, विद्यापीठं लुटली. त्यांनी ३ दशकं सहकार टिकवणाऱ्यांना शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत पडूच नये.”
……………
कसबा बावडयातील लोकांशी आमचे सलोख्याचे संबंध
महाडिक यांनी पत्रकांत म्हटले आहे, “बावड्यातील अनेक लोकांशी आमचेही सलोख्याचे संबंध आहेत. मागील ३० वर्षं आम्ही बावड्यात येतो. त्यामुळे आम्हाला बावडा परका नाही. सतेज पाटलांनी विनाकारण बावडा त्यांची जहागीर असल्यासारखी वक्तव्ये करून बावड्याची बदनामी करू नये. सतेज पाटलांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिले जाईल. सभेच्या दिवशी जर जाणूनबुजून कोणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला किंवा आमच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर जश्यास तसे उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. तसा प्रसंग येऊ नये ही जबाबदारी आमची एकट्याची नाही तर दोघांचीही आहे. याचं भान ठेवूनच त्यांनी इथून पुढे वक्तव्ये करावीत.’