महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा ताळेबंद पाहता आर्थिक परिस्थिती फारशी चांगली आहे, असे वाटत नाही. आर्थिक ताळेबंदात अनेक त्रुटी असून त्या दूर करण्यासाठी कारखान्याचे मागील तीन वर्षाचे शासकीय लेखापरिक्षण करावे, अशी मागणी ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन अरुण नरके यांनी रविवारी पत्रकातून केली. कारखान्याच्या वार्षिक सभेच्या अगोदर नरके यांनी पत्रका प्रसिद्धीस दिले आहे.
नरके म्हणाले, ‘स्वर्गीय डी. सी. नरके यांनी ‘कुंभी’ची उभारणी केली. पारदर्शक कारभारातून त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरल्याने संपुर्ण महाराष्ट्रात ‘कुंभी’चा नावलौकिक निर्माण झाला. मात्र अलिकडील पाच-दहा वर्षात कारखान्याची आर्थिक घडी विस्कटल्याची चर्चा सुरु आहे. कारखान्यांचा ताळेबंद पाहिला तर अहवालात अनेक त्रुटी आढळतात.
इतर कारखान्यात डिस्टीलरी युनिट व सहवीज प्रकल्प नसतानाही ऊसाला उच्चांकी दर व कामगारांचे वेतन वेळेत दिले. मग ‘कुंभी’मध्ये कामगारांना आठ महिने वेतन का नाही? कारखान्याचा पगार, स्टोअर, दुरुस्ती आणि व्याजाचा खर्च हा इतर कारखान्यांच्या तुलनेत जास्त असण्याचे कारण काय ? अशी विचारणा केली आहे.
वार्षिक अहवालातील आकडेवारीच्या अनुषंगाने नरके यांनी साखर निर्यात अनुदान ८ कोटी ४३ लाख २ हजार तसेच बफर स्टॉक क्लेम अनुदान १ कोटी ४२ लाख इतके उत्पन्न दाखवले आहे. मात्र ३१ जुलै २०१९ च्या शासकीय आदेशानुसार बफर स्टॉक क्लेम अनुदान बंद झाले असताना हे अनुदान कोणत्या वर्षातील आहे, याचा खुलासा अपेक्षित आहे
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून आर्थिक वर्षात १४.७५ कोटी मध्यम मुदत कर्ज घेतले. हे कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले ? अहवाल सालात ५ लाख रुपये नफा दाखवण्यात आला आहे. कमी पगार खर्ची टाकून तोटा लपवण्याचा प्रयत्न केला आहे काय ? असे अनेक प्रश्न ‘कुंभी’च्या सभासदांना पडले आहेत. ’असे पत्रकांत म्हटले आहे.