महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : महिलांना स्वयंरोजगारातून स्वाभिमानाकडे नेण्यासाठी जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशन कटिबद्ध आहे असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले. महिलांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फाउंडेशन योग्य व्यासपीठ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी कैलासगडची स्वारी मंदिरात फाउंडेशनचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रेमला पंडितराव जाधव, उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, डॉ. दश्मीता जाधव प्रमुख उपस्थित होत्या.
सुरवातीला दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कुंकुमार्चन सोहळ्याने फाउंडेशनचे उद्घाटन झाले. आमदार जाधव यांनी समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे, सक्षम करण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले.
“वर्षभर विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपक्रम राबवू. महिलांनी फाउंडेशनचे सभासद व्हावे” असे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मीता जाधव यांनी केले.
नवरात्र उत्सव निमित्त नऊ दिवस शहरातील विविध भागात फाउंडेशनच्या माध्यमातून कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुंकुमार्चन सोहळ्यात महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन उद्योजक सत्यजित जाधव यांनी केले.
यावेळी सुनंदा जाधव, योगेश्वरी महाडिक, शारदा देवणे, श्वेता देवणे, मालिनी पोवार, सुनिता पाटील, विना परमार, सेजल सलगर, सरिता पवार उपस्थित होत्या.
---