कार्यवाहीची दिशा ठरवू. न्यायव्यवस्थेचा सन्मान ठेऊन निर्णयाचा स्वीकार
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ९७३ सभासदांना अपात्र ठरविण्याचा हायकोर्टाचा निर्णय निश्चितपणे आमच्यासाठी धक्कादायक आहे. केवळ राजकारणासाठी या सभासदांना विरोध करण्यात आला, ही बाब निश्चितच खेदजनक आहे. सभासदांच्या न्याय हक्कासाठी इथून पुढच्या काळातही आम्ही आमचा लढा चालूच ठेऊ. कायदेशीर बाबी तपासून पुढील दिशा ठरवणार असल्याचे कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी म्हटले आहे.
महाडिक यांनी पत्रकांत म्हटले आहे, ‘ विरोधकांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन कारखान्याच्या १८९९ पात्र सभासदांबाबत निष्कारण तक्रार करून त्यांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत चौकशी केली होती पैकी ४८४ सभासद याआधीच पात्र ठरविले होते. उर्वरित १४५७ सभासदांपैकी कार्यक्षेत्राबाहेरील भादोले येथील ३३८ , दुबार व तिबार नावे असलेले ६९, शेअर्स रद्द झालेले २ आणि मृत ३३ अश्या एकूण ४४२ सभासदांच्या चौकशीचा मुळातच प्रश्न उद्भवत नव्हता. हे ४४२ सभासद असेही मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकत नव्हते.
९७३ सभासदांनीही कारखान्याच्या पोटनियमास अनुसरूनच सभासदत्व घेतले होते. हे सभासद महाडिक यांना मानणारे असल्यानेच राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन या सभासदांना लक्ष्य केले गेले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्तेचा वापर करून आमच्या विरोधकांनी त्यांना हवा तसा सहकार खात्याकडून निकाल लावून घेतला. व तशीच शेरा असलेली कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली गेली.
या सर्व प्रक्रियेमध्ये सभासदांच्या वतीने न्यायालयासमोर ठाम बाजू मांडली, तथापि कोर्टाने दिलेल्या निकालाने कारखान्याचे खरे मालक असलेले ९७३ सभासद शेतकरी त्यांच्या अधिकारापासून वंचित राहणार आहेत. ही बाब निश्चितपणे सभासदांच्यासाठी क्लेशदायक आहे. त्यामुळे त्यांच्या न्याय्यहक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहून लढतच राहू आणि न्यायव्यस्थेचा पूर्ण सन्मान राखून निकालातील सर्व कायदेशीर बाबी पडताळून पुढील कार्यवाहीची दिशा ठरवू.