महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धा- २०२२-२३ 'नाट्यरंजन' च्या यजमानपदाचा बहुमान कोल्हापूरला मिळाला आहे. आंतर परिमंडळीय नाट्यस्पर्धेतील विजेते नागपूर, औरंगाबाद, कोंकण व पुणे या प्रादेशिक विभागाचे नाट्यसंघ कोल्हापूरात होणाऱ्या राज्यस्तरीय अंतिम स्पर्धेत सहभागी होणार आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात १० व ११ नोव्हेंबर २०२२ रोजी हा सोहळा रंगणार आहे, अशी माहिती आयोजक तथा कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी दिली आहे.
राज्यातील १६ परिमंडळासाठी संबंधित प्रादेशिकस्तरावर केले जाते. या पहिल्या फेरीत प्रथम क्रमांकाचे विजेते ठरलेले नाट्यसंघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी आहेत. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत कोविड- १९ मुळे दोन वर्षे खंड पडला होता. कोल्हापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत उद्घाटन समारंभानंतर पहिल्या सत्रात १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. नागपूर प्रादेशिक विभागातील विजेता चंद्रपूर परिमंडळाचा संघ प्र.ल. मयेकर यांनी लिखित 'तो परत आलाय ' हे नाटक सादर करणार आहे. त्याच दिवशी दुसऱ्या सत्रात दुपारी २.३० वाजता कोंकण प्रादेशिक विभागातून विजेता प्रकाशगड मुख्यालय संघ इरफान मुजावर यांनी लिखित 'सलवा जुडूम' हे नाटक सादर करणार आहे. दि.११ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वा. पहिल्या सत्रात औरंगाबाद प्रादेशिक विभागातील विजेता नांदेड परिमंडळाचा संघ अभिजित वाईकर यांनी लिखित 'नजरकैद ' हे नाटक सादर करणार आहे. त्याच दिवशी दुसऱ्या सत्रात दुपारी २.०० वाजता पुणे प्रादेशिक विभागातील विजेत्या परिमंडळाचा संघ नाटक सादर करेल.नाट्यस्पर्धेचा उद्घाटन समारंभ १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांच्या हस्ते होणार आहे. नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता व्यवस्थापकी संचालक विजय सिंघल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून अभिनेते ऋषिकेश जोशी उपस्थित असणार आहेत. याप्रसंगी संचालक प्रकल्प तथा मानव संसाधन संचालक प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य)मुरहरी केळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विशेष निमंत्रित म्हणून सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, मंगेश गोंदावले, अरविंद भादीकर, सुहास रंगारी, अंकुश नाळे, यांची उपस्थिती असणार आहे. या नाट्यस्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांसाठी नाट्यरसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. तरी नाट्यरसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परेश भागवत यांनी केले आहे.
---