महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
“माजी आमदार अमल महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या बाबत भाष्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. महाडिक यांचे शेवटचे सत्ताकेंद्र राजाराम कारखाना ही त्यांच्या हातून न भूतो अशा मतांच्या फरकाने जाणार असून महाडीक यांना पॅनेल करण्यासाठी तरी माणसे मिळतील की नाही याची शंका असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे.” अशी टीका आमदार पाटील समर्थक व माजी नगरसेविका भारती पोवार यांनी केली आहे.
राजाराम साखर कारखान्याची शुक्रवारी (ता.३० सप्टेंबर) सर्वसाधारण सभा होत आहे. सभेच्या निमित्ताने पाटील व महाडिक यांचे एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. आता या वादात माजी नगरसेविका पोवार या सहभागी होत त्यांनी महाडिकांवर टीकास्त्र सोडले आहे.
पोवार यांच्या नावांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे, “ महाडीकांसारख्या प्रवृत्तीमुळे कायद्याचे राज्य ही संकल्पना धोक्यात आली आहे. खादी ग्रामोद्योगच्या जमिनीचा ताबा जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात असून देखील बेकायदेशीर पणे पोलीस प्रोटेक्शन घेऊन सदर जागे वर ताबा ठेवत नव्याने पत्रे मारण्यात आले. हा न्यायालयाचा अवमान आहे.”