सत्ताधारीकडून प्रियांका पाटील, भाजपप्रणित आघाडीच्या सुवर्णा गाडगीळ, ठाकरे गटातर्फे भारती ओतारी
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाचगाव ग्रामंचायत ही राजकीयदृष्या काँग्रेस व भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. जवळपास वीस हजार मतदान, शहराननजीकची ग्रामपंचायत आणि वेगाने वाढणारे गाव म्हणून पाचगावची ओळख. विधानसभा निवडणुकीत तर पाचगावचा कौल महत्वाचा ठरतो. यामुळे पाचगाव ग्रामपंचायतवर वर्चस्व मिळवण्यासाठी नेहमीच नेतेमंडळी राजकीय ताकत पणाला लावतात. यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेस प्रणित सत्ताधारी श्री भैरवनाथ पाचगाव व उपनगर विकास आघाडी विरोधात भाजपप्रणित श्री भैरवनाथ-महादेव उपनगर ग्रामविकास आघाडी अशी लढत स्पष्ट आहे. शिवसेना ठाकरे गटही मैदानात आहे.
सत्ताधारी श्री भैरवनाथ पाचगाव व उपनगर विकास आघाडीतर्फे विद्यमान सरपंच संग्राम पाटील यांच्या पत्नी प्रियांका पाटील या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. विरोधी भाजपप्रणित श्री भैरवनाथ –महादेव उपनगर ग्रामविकास आघाडीतर्फे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ यांच्या पत्नी सुवर्णा गाडगीळ या सरपंचपदाची निवडणूक लढवित आहेत. शिवसेना ठाकरे गटातर्फे पाचगाव पूर्व विभागप्रमुख संतोष ओतारी यांच्या पत्नी भारती ओतारी या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. सरपंचपदासाठी अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे उमेदवारी अर्ज माघारीनंतर म्हणजे सात डिसेंबरनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. सध्य स्थिती पाहिली की काँग्रेस, भाजप प्रणित आघाडी आणि ठाकरे गटाचे उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
सतरा जागा आणि सरपंचपदासाठी थेट लढत अशा एकूण १८ जागेसाठी १८ डिसेंबरला मतदान होत आहे. पाचगावमध्ये गटातटाच्या राजकारणाची खुमारी जास्त.यामुळे येथील निवडणूक नेहमीच चुरशीची ठरली आहे. गेल्या निवडणुकीतही सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत संग्राम पाटील यांनी बाजी मारली होती. भाजप प्रणित आघाडीच्या उमेदवार मनिषा पाटील यांना दुसऱ्या क्रमांकांची मते तर शिवसेनेचे तत्कालिन उमेदवार अजिंक्य पाटील यांना तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली होती.पाच वर्षानंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसप्रणित आघाडी, भाजपप्रणित आघाडी आणि ठाकरे गटप्रणित आघाडी निवडणुकीची तयारी करत आहेत. पक्षाच्या चिन्हावर प्रत्यक्षात निवडणूक होत नसली तरी पाचगावमधील लढत मात्र नेते आणि पक्षाभोवती फिरणार आहे.