मुलांच्यासोबत रात्रीचे जेवण अन् मुक्कामही !!
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुदानित व स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित वसतिगृहातील सोयी सुविधांमध्ये वाढ करणे तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ४६ अनुदानित वसतिगृहांना समाजकल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तसेच सर्व तपासणी अधिकाऱ्यांनी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यासोबत रात्रीचे जेवण करून मुक्काम केला. विद्यार्थ्यांची दिनचर्या समजून घेतली. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करणे बाबत विद्यार्थ्याबरोबर हितगुज केले.
तपासणीमध्ये आढळून आलेल्या उणिवा किंवा चांगल्या बाबी बाबत एकत्रित तपासणी अधिकारी व अधीक्षकांची येत्या २३ ऑगस्ट रोजी एकत्रित चर्चासत्र ठेवले आहे. जेणेकरून गुणवत्तेमध्ये वाढ होईल अशी माहिती समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली. दरम्यान या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.