महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
राष्ट्रीय पातळीवरील‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’हा मानाचा पुरस्कार हंगाम २०२१-२२ साठी कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास मिळाला आहे.देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्लीतर्फे देण्यात येतो.
हा पुरस्कार नवी दिल्ली येथे समारंभपुर्वक कारखान्यास प्रदान करण्यात येणार आहे. हंगाम २०१८-१९ मध्ये "शाहू " या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. दिल्ली येथील राष्ट्रीय साखर महासंघाचे पुरस्कार मिळाल्याचे पत्र प्राप्त होताच संचालक, सभासद शेतकरी,अधिकारी-कर्मचारी, व हितचिंतक यांनी गैबी चौक,खर्डेकर चौक, श्रीराम मंदिर,कारखाना कार्यस्थळावर तसेच गावोगावी फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. कारखाना प्रांगणातील आराध्य दैवत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कारखान्याचे संस्थापक चेअरमन विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
….
हा पुरस्कार शाहू महाराज व सभासद शेतकऱ्यांना अर्पण
“कारखान्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हिताच्या कृतीचा वारसा, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखाना चालवणेसाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे ,तसेच कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांचे मार्गदर्शन ,सभासद , शेतकऱ्यांनी विश्वासाने व प्रामाणिकपणाने दिलेली साथ, व्यवस्थापनाचे नियोजनास अधिकारी-कर्मचारी यांच्या कष्टाची जोड, याचे हे फलित आहे.”
-समरजितसिंह घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष