हद्दवाढीचा संपला आहे, रविवारी होणाऱ्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : “कोल्हापूर महानगपालिकेच्या अखत्यारितील हद्द व आसपासच्या ४२ गावांच्या विकासासाठी २०१७ मध्ये कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणची स्थापना झाली आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर शहर व आसपासच्या गावांचा विकास आराखडा बनवून अंमलबजावणी करावी. विकास करण्याची जबाबदारी प्राधिकरणची आहे. सरकार, लोकप्रतिनिधींनी यामध्ये पुढाकार घेत ग्रामीण भाग व महापालिका क्षेत्राच्या विकासावर भर द्यावा. प्राधिकरणाच्या स्थापनेमुळे हद्दवाढीचा विषय संपला आहे ’अशी भूमिका हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. राजू माने, नारायण पोवार, भगवान काटे, प्रकाश लोटे, मधुकर जांभळे आदींनी पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत बोलताना पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका हद्दवाढीत समाविष्ठ करण्याच्या प्रस्तावात ज्या गावांचा समावेश आहे, अशा गावांचा महानगरपालिकेने पहिल्यांदा विकास आराखडा जाहीर करुन लोकांशी चर्चा करावी.असा मुद्दा मांडला.
शिवाय हद्दवाढीसंबंधी समर्थक आणि विरोधकांची रविवारी (ता.२५ सप्टेंबर) कोल्हापुरात जी बैठक होणार आहे, त्या बैठकीत हद्दवाढ विरोधी कृती समिती सहभागी होणार नाही.ही बैठक आणखी काही दिवसान घ्यावी असे आवाहनही यावेळी संबंधितांनी केले. संबंधित गावातील पदाधिकारी व नागरिकांशी चर्चा केल्याशिवाय बैठकीत सहभागी होणे योग्य ठरणार नाही. हद्दवाढीसंबंधी बैठकीला जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असावेत, त्यांच्या उपस्थितमध्येच बैठका घ्यावेत यासंबंधीचे निवेदनही हद्दवाढ समर्थक व विरोधकांकडून संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करुन अंमलबजावणी केल्यास मेट्रोसिटी सारखी सिटी तयार होईल. आणि कोल्हापूर शहराचा हद्दवाढ हा विषय बाजूला होईल असेही यावेळी सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला प्रकाश टोपकर, बबन शिंदे, महादेव खानविलकर, विश्वजित बगाडे, सर्जेराव साळुंखे आदी उपस्थित होते.