वीस पटाखालील शाळा बंद होऊ नयेत यासाठी पाठपुरावा करणार, शिक्षणमंत्र्यांच्यासोबत बैठकीची ग्वाही
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
वीस पटाखालील शाळा बंद करू नयेत यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा केली. वाडीवस्तीवरील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत अशी आग्रही भूमिका मांडली. याप्रसंगी आमदार आबिटकर यांनी, ‘ शाळा बंद होऊ नयेत यासाठी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याशी बैठकही लावू. तसेच पटसंख्या अभावी शाळा बंद न करण्याबाबत सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करू’ असे आश्वासन पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.
“बालकांचा शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार कायदा २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना १ किमी अंतरा पर्यंतच्याच शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार असताना वाड्या वस्त्यांवरील वीस पटाखालील शाळा बंद करण्याचा अधिकार सरकारला नाही. तरीसुध्दा सरकार या शाळा बंद करण्याचा प्रयत्न करू पाहत आहे . वाड्या वस्त्यांवरील शाळांतील मुलांना जवळच्या मोठ्या शाळेत जायचे झाले तर किमान पाच-दहा कि मी अंतरापर्यंत शाळा नाहीत. त्यामुळे अशा शाळा बंद करू नयेत” अशी मागणी आमदार आबिटकर यांच्याकडे करण्यात आली. अशा शाळा बंद करू नयेत यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, तानाजी पावले, रंगराव वाडकर, पी. आर. पाटील, अशोक भांदिगरे, एन. एस. पाटील, आर. एस. पाटील, आनंदा साळोखे , शामराव शेटके , संजय कुदळे , अमोल हेगडे आदी उपस्थित होते.