गोखले कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतला निर्णय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
पन्नाशी पार केलेल्या आणि तीस वर्षापूर्वी एका वर्गातून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी आता मैत्रीचे रूपांतर सोयरिकतेत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुला मुलींच्या साठी बाहेर वधू-वर शोधत बसण्यापेक्षा जात आणि धर्माच्या भिंती तोडत आपल्या मित्रमैत्रिणींच्या मुलामुलींना सून अथवा जावई करून घेण्याचा निर्धार त्यांनी केला. पुरोगामी कोल्हापूरात मैत्रीचं पुढचं पाऊल टाकण्याचा निश्चय केला आहे तो गोपाळकृष्ण गोखले कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी.
गोपाळकृष्ण गोखले कॉलेजमधून १९९४ मध्ये बीए उत्तीर्ण माजी विद्यार्थी नुकतेच एकत्र आले. ते गेट-टुगेदर च्या निमित्ताने. या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांची मुलं आता विवाहाच्या उंबरठयावर आहेत. अनेक मुला -मुलींचे शिक्षण पूर्ण झाले आहे. अशावेळी मैत्रीचे रूपांतर सोयरिकतेत करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला. सध्या मुलांच्या आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा, मुलींची घटलेली संख्या यामुळे लग्नाच्या समस्या वाढल्या आहेत. अशावेळी आपण सारे एकमेकांना ओळखतो, तर आपल्या मुलामुलींच्या पसंतीनुसार सोयरिकता जुळविण्यात अडचण काय ? असा सवाल काहींनी बैठकीत केला. हा मुद्दा सर्वांनाच आवडला. आपल्या मैत्रीचा आणि ओळखीचा फायदा आपल्या मुलांच्या लग्नासाठी होत असेल तर तसे प्रयत्न करायला काहींच हरकत नाही, यावर सर्वांचे एकमत झाले. त्यासाठी लवकरच सहकुटुंब मेळावा घेत आपल्याआपल्यातच सून आणि जावई शोधण्याचा निर्णय घेण्यात आला. हे नवं नातं तयार करताना जात आणि धर्माच्या भींती पार करण्याचे ठरले.
या मेळाव्यास कॉलेजचे निवृत्त प्रा. श्रीनिवास पाटील व निवृत्त ग्रंथपाल शशीकांत पवार उपस्थित होते. त्यांना ही संकल्पना आवडली. प्रा. पाटील यांनी असे लग्न जुळल्यास ५१ हजार रूपये अहेर देण्याची घोषणा केली. यावेळी दोन्ही गुरुजनांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सुभाष बिरंज़े, नीलेश देसाई ,प्रकाश सुतार, प्रा. डॉ. विनायक भागवत, प्रकाश पाटील, गुरुबाळ माळी, नवाब शेख यांचा समावेश होता.